महाविकास आघाडीच्या अत्यंत जाचक असलेल्या वसुली पद्धतीमुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. दोन वर्षापासून कोरोना आणि अतिवृष्टी चा सामना करत असले...
महाविकास आघाडीच्या अत्यंत जाचक असलेल्या वसुली पद्धतीमुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. दोन वर्षापासून कोरोना आणि अतिवृष्टी चा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांवर जाणून बुजून या जुलमी सरकारने विद्युत रोहित्र सोडून जीवनामध्ये अंधार केला आहे. त्यामुळे अनेक पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. अशा अवस्थेत शिवारातील ऊस गणितासाठी लवकर गेला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी असताना कारखानदारांची मुजोरी वाढतच चालली आहे. मात्र जनशक्ती संघटना शांत बसणार नसून कारखानदारांनी पुढे हात पसरण्याची वेळ येऊ देणार नसल्याचे प्रतिपादन जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी केले.
बालेवाडी (ता. करमाळा) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की बालेवाडी व परिसरात 3 ते 4 साखर कारखाने असताना देखील गावचा ऊस नेण्यासाठी एकही साखर कारखाना पुढं येत नाही हे मोठी शोकांतिका आहे. शिवाय गावातील बऱ्याच अपंग, निराधार गरजू लोकांसाठी, शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना यांसारख्या अनेक योजना गावातील लोकांसाठी महाराजस्व अभियानामार्फत जास्तीत जास्त मार्गी लावण्याचा शब्द या निमित्ताने जनशक्ती च्या वतीने देण्यात आला. यावेळी निखिल सरडे, मारुती खटके, बालाजी तरंगे, किशोर शिंदे, अभिजित नवले, अक्षय शिंदे, काका कोळी, सागर शिंदे, रोहन नाईकनवरे, शरद एकाड, अतुल राऊत, राणा वाघमारे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.