प्रतिनिधी। करकंब आताचे तरूण व्यायामाचे महत्व विसरुन चालले असून नको त्या फालतू गोष्टीत रस घेत असल्याने आजारांचे प्रमाण वाढल्याने घर हे मे...
प्रतिनिधी। करकंब
आताचे तरूण व्यायामाचे महत्व विसरुन चालले असून नको त्या फालतू गोष्टीत रस घेत असल्याने आजारांचे प्रमाण वाढल्याने घर हे मेडिकल झाले आहे. त्या घराला व्यायामशाळा बनवा, असे आवाहन करकंब येथील प्रतिबिंब कला व क्रीडा मंचचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब घाडगे (वस्ताद) यांनी व्यक्त केले.
करकंब येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये दि. १२ जानेवारी रोजी राजमाता व राष्ट्रमाता जीजाऊ स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली त्या वेळी ते बोलत होते. यावेळी सीमा बाळासाहेब घाडगे यांना हिरकणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सुरुवातीला जीजाऊ माता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
पुढे बोलताना बाळासाहेब घाडगे म्हणाले की, सारे जणच पैशाच्या पाठीमागे लागले आहेत. पैसा हे सर्वस्व नसून एक सुसंस्कृत नागरिक कसा घडविता येईल हे पाहिले पाहिजे. सध्या आई-वडिलांना आपल्या मुलांकडे लक्ष देण्यास अजिबात वेळ नसतो. ते काय करतात हेही माहीत नसते. अभ्यासाच्या नावाखाली मुले इतर गोष्टीत वेळ घालवितात पण व्यायामासाठी थोडासा वेळ देत नाहीत. स्कूल कमिटीचे अध्यक्ष संजीवकुमार म्हेत्रे यांनी सांगितले की, कोणतेही पुरस्कार हे सहजासहजी मिळत नाहीत. त्यासाठी तन, मन लावून प्रामाणिकपणे काम करावे लागते. कोणतेही चांगले क्षेत्र निवडून त्यात नावलौकिक मिळविण्यासाठी प्रयत्नशील रहावे. कवी लक्ष्मण जाधव यांनी 'राजमाता जीजाऊ' ही कविता सादर केली. डाॅ. नितीन खाडे यांनीही आपले विचार व्यक्त केले. कनकंबा ग्रुप व स्व. दत्ता खारे चेअरमन प्रतिष्ठानच्या वतीने चेअरमन सतिश खारे यांनी विशेष सहकार्य केले.
यावेळी मुख्याध्यापिका संगीता करमाळा, अविनाश देवकते, ग्रा. पं. सदस्य बापू शिंदे, रमेश म्हेत्रे, विजय म्हेत्रे, प्रशांत वेळापूरकर, मोहनसिंग रजपूत, महादेव माळी, अशोक खपाले, शंकर गायकवाड, लऊळकर सर, जयंत सोमण, सपना नाखील, सुनिल मेहरकर इ. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव चव्हाण यांनी तर आभार पर्यवेक्षिका लक्ष्मी शिंदे यांनी मानले.